MahaDbt: अर्ज घेण्यास पुन्हा सुरुवात
पोर्टलवर अर्ज केल्यानंतर लॉटरीत अद्याप नाव न आलेल्या शेतकऱ्यांना आता अर्जातील बाबींमध्ये विनाशुल्क बदल करता येणार आहे.
पुणे : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर अर्ज केल्यानंतर लॉटरीत अद्याप नाव न आलेल्या शेतकऱ्यांना आता अर्जातील बाबींमध्ये विनाशुल्क बदल करता येणार आहे. तसेच नव्याने अर्ज स्वीकारणी सुरू झाली असून, त्यासाठी कोणतीही अंतिम मुदत ठेवण्यात आलेली नाही.
कृषी खात्याच्या विविध योजनांमधील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दर वेळी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करण्याची किचकट पद्धत आता बंद करण्यात आली आहे. पारदर्शकतेसाठी सर्व सुविधा देणारे हे महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. बहुतेक योजनांसाठी एकाच ठिकाणी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा मिळाल्याने १२ लाख शेतकऱ्यांनी पहिल्याच टप्प्यात २४ लाख बाबींसाठी अर्ज केले आहेत.
हे पण वाचा :- MahaDbt मधील या योजना ९०% अनुदान- Online अर्ज सुरू
कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण) म्हणाले, की पोर्टलवर २०२०-२१ साठीच्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानुसार काढलेल्या लॉटरीमधील शेतकऱ्यांना काही ठिकाणी पूर्वसंमती पत्रे देणे सुरू आहे. तर काही योजनांमध्ये निधीची उपलब्धता पाहून कामे सुरू आहेत. मात्र कोणत्याही योजनेसाठी निवड न झालेल्या शेतकरी आता पुन्हा पोर्टलवर जाऊन त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करू शकतात. आम्ही असे सुधारित अर्ज २०२१-२२ करिता ग्राह्य धरणार आहोत. तसेच असा बदल करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्यभर कोणत्याही सामूहिक सेवा केंद्राची मदत शेतकरी घेऊ शकतात. मात्र कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास या helpdeskdbtfarmer@gmail.com मेलवर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक मात्र आधी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.
एखाद्या शेतकऱ्याकडे आधार क्रमांक नसल्यास प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. आधारचा असा नोंदणी क्रमांक मिळताच पुन्हा महाडीबीटी पोर्टलमध्ये तो क्रमांक नमूद करून योजनांसाठी अर्ज करता येईल. मात्र आधार क्रमांक प्रमाणित करून घेतला नसल्यास अनुदानाचे वितरण होणार नाही, असे कृषी खात्याने पुन्हा स्पष्ट केले आहे.
राज्यातील शेतकरी आता कोणत्याही वेळी नोंदणी किंवा विविध योजनांसाठी अर्ज ऑनलाइन करू शकतील. त्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली नाही. लॉटरी निघण्याच्या काही दिवस आधी अर्ज देण्याची प्रक्रिया स्थगित होईल. लॉटरी निघल्यानंतर पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अनुदान वाटण्यासाठी शासनाकडून निधी जसा उपलब्ध होईल त्यानुसार लॉटरी निघत राहील.
-विकास पाटील,कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग
संदर्भ :- agrowon.com