पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी

पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी 

महा-ई-सेवा केंद्र धारकांनी रात्रीचा दिवस करून खूप शेतकर्‍यांचा पीक विमा काढला. गेल्या वर्षी मायणी भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय अनेक भागात पावसाने ओढ दिली.

त्यामुळे पेरणी होऊनही फारसं उत्पादन काही निघाले नाही. काही ठिकाणी पेरण्या होऊनही पिक उगवलेच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पेरणी आणि मशागतीचा खर्च वाया गेला होता. अनेक शेतकर्‍यांचा डोळा पीक विम्याकडे लागलेला होता. पीक विम्याबाबत अनेक तर्क वितर्क ही लावले जात होते.

अखेर दोन दिवसांपासून मायणी परिसरातील शेतकर्‍यांच्या खात्यावर पिकांच्या प्रतवारीप्रमाणे पीक विमा रक्कम जमा होऊ लागलेली आहे. नेमकं पेरणीच्या हंगामात ही पीक विमा रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर येत असल्याने शेतकरी वर्गामध्ये हर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पेरणी खोळंबली

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी ही एक रुपयात पीक विमा योजना लागू आहे. मात्र, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस, तर काही ठिकाणी अजून पाऊस झाला नसल्याने अशा दोन्ही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शासनाने यावर्षी पीक विमा उतरवण्याची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे.

यंदा मुदतवाढ देण्याची गरज

गेल्या वर्षी जून, जुलै महिन्यामध्ये एक रूपयामध्ये पीक विमा योजना प्रभावीपणे राबवण्यात येत होती. ऑनलाइन अर्ज भरताना मोठा अडथळा येत असतानाही महा-ई-सेवा केंद्र चालकांनी रात्रीचा दिवस करून अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा काढला, याचा फायदा आज शेतकर्‍यांना मिळताना दिसत आहे.