अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा — आतापर्यंत ८ हजार कोटींचे वाटप, आणखी ११ हजार कोटींचे अर्थसहाय्य मंजूर!
29-10-2025

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा — आतापर्यंत ८ हजार कोटींचे वाटप, आणखी ११ हजार कोटींचे अर्थसहाय्य मंजूर!
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी एकूण ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत ८ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असून ४० लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळाला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अजून ११ हजार कोटी रुपये वाटपासाठी मान्यता देण्यात आली असून ही मदत पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, “अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. मदतीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. पुढील १५ दिवसांत किमान ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचेल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
यासोबतच, काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये किंवा नोंदींमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने निधी वितरणात अडथळे येत आहेत. शासनाने या सर्व बाबींची तपासणी सुरू केली असून, उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांनाही मदत तातडीने मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शासनाच्या म्हणण्यानुसार, ई-केवायसी प्रक्रियेद्वारे पात्र शेतकऱ्यांनाच मदत मिळेल, तर अॅग्रीस्टॅक डेटामध्ये नोंद असलेल्या शेतकऱ्यांना थेट निधी हस्तांतरित केला जात आहे.
या निर्णयामुळे हजारो अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 🌾
