कुसुम सोलार पंप योजनेत मोठा गैरप्रकार | शेतकऱ्याच्या अर्जात मोबाईल नंबर बदलला
01-01-2026

कुसुम सोलार वॉटर पंप योजनेत गंभीर फसवणूक?
शेतकऱ्याच्या अर्जातील मोबाईल नंबर बदलून वेंडर निवड झाल्याचा आरोप
राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त कुसुम सोलार वॉटर पंप योजनेत (KUSUM Solar Pump Scheme) शेतकऱ्यांच्या अर्ज प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि संभाव्य फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याच्या अर्जातील मोबाईल नंबर आणि वेंडर निवड कोणत्याही परवानगीशिवाय बदलल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया किती सुरक्षित आहे, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री. गोविंद बापूसाहेब गिते यांनी ७.५ HP क्षमतेच्या कुसुम सोलार वॉटर पंपासाठी MEDA (महाऊर्जा) अंतर्गत अधिकृत अर्ज केला होता.
अर्ज क्रमांक : MK23111382574
अर्ज दिनांक : १ नोव्हेंबर २०२५
अर्ज माध्यम : Meda Beneficiary App
श्री. गिते यांनी स्वतः शेताचा सेल्फ सर्व्हे पूर्ण करून शेतकरी हिस्सा म्हणून सुमारे ₹39,000 रुपये ऑनलाइन भरले होते.
मोबाईल नंबर आणि वेंडर बदलल्याचा संशय
शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार,
त्यांनी अर्ज करताना दिलेला मोबाईल नंबर नंतर सिस्टिममध्ये बदललेला आढळून आला
त्यांनी कोणताही वेंडर (कंपनी) निवडलेला नसतानाही त्यांच्या नावावर एका कंपनीचा वेंडर निवड झालेला दिसत आहे
महत्त्वाची बाब म्हणजे,
शेतकऱ्याने जाणीवपूर्वक वेंडर निवड प्रक्रिया पुढे ढकलली होती, कारण योग्य आणि विश्वासार्ह सेवा देणारी कंपनी लिस्टमध्ये यावी अशी त्यांची अपेक्षा होती.
लॉगिन करताना उघड झाला प्रकार
काही दिवसांनी अर्जाची स्थिती तपासण्यासाठी शेतकऱ्याने लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. मात्र,
मोबाईलवर OTP येत नसल्यामुळे लॉगिन होत नव्हते
त्यानंतर त्यांनी अर्ज क्रमांक व पासवर्ड वापरून वेबसाइटवर लॉगिन केले
तेव्हा मोबाईल नंबर बदललेला आणि वेंडर निवड झालेली असल्याचे स्पष्ट झाले
यामुळे शेतकऱ्याला धक्का बसला असून, अज्ञात व्यक्तीने सिस्टममध्ये हस्तक्षेप करून हा बदल केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्याची MEDA कडे तक्रार
या संपूर्ण प्रकाराबाबत श्री. गोविंद गिते यांनी MEDA (महाऊर्जा) कडे तक्रार दाखल केली आहे.
त्यांची मुख्य मागणी आहे की:
अर्जातील मोबाईल नंबर कोणी व कसा बदलला, याची चौकशी करावी
वेंडर निवड प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारावर तात्काळ कारवाई करावी
भविष्यात शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये अशा प्रकारची छेडछाड होऊ नये यासाठी सिस्टम अधिक सुरक्षित करावी
कुसुम योजनेतील ऑनलाइन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
OTP आधारित लॉगिन असूनही नंबर बदल कसा झाला?
वेंडर निवड शेतकऱ्याशिवाय कशी शक्य आहे?
अशा घटना आणखी किती अर्जांमध्ये घडल्या असतील?
असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? (महत्त्वाचे)
अर्ज केल्यानंतर नियमितपणे लॉगिन करून तपासणी करा
मोबाईल नंबर, ई-मेल व अर्ज स्थिती सतत तपासात ठेवा
संशयास्पद बदल आढळल्यास तात्काळ MEDA कार्यालयाशी संपर्क साधा
गरज भासल्यास जिल्हा कार्यालय किंवा सायबर क्राइममध्ये तक्रार नोंदवा