मे चा पाऊस होता फक्त ट्रेलर, खरा मान्सून 'या' तारखेनंतर..!
07-06-2025

मे चा पाऊस होता फक्त ट्रेलर, खरा मान्सून 'या' तारखेनंतर..!
गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा भागात सतत ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यांचा अनुभव येतोय. त्यामुळे अनेक शेतकरी बांधव पेरणीसंदर्भात संभ्रमात आहेत. वाऱ्यांची तीव्रता, आकाशात पसरलेले ढग, आणि अधूनमधून होणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे खरीप हंगामासाठी योग्य वेळ कधी हे समजणे कठीण झाले आहे.
हवामान तज्ज्ञांचा सल्ला: खरा मान्सून १४ जूननंतर:
हवामान तज्ञांच्या मते, खरा आणि स्थिर मान्सून १४ जूननंतर महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत आलेल्या पावसाला मान्सून समजून पेरणी करू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
वाऱ्यांमागचं कारण 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'
सध्या जोरात वाहणारे वारे मान्सूनशी संबंधीत नसून, 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' या हवामान बदलामुळे ते निर्माण होत आहेत. या वाऱ्यांमुळे ढगांची योग्य निर्मिती होत नाही आणि खऱ्या मान्सूनच्या आगमनात विलंब होतो, असे औंधकर यांनी सांगितले.
पेरणीसाठी किती पाऊस आवश्यक?
शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी किमान १०० ते १५० मिमी पावसाची नोंद आणि त्यानंतर ५-६ दिवस सलग हलकासा पाऊस होणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीत योग्य ओलावा निर्माण होतो. याच ओलाव्यावर पिकाचा भवितव्य ठरतं, त्यामुळे घाई करून बियाण्यांचं नुकसान होऊ नये.
खरीप पेरणीचा योग्य कालावधी कोणता?
१५ ते ३० जून हा खरीप पिकांसाठी पेरणीस सर्वाधिक योग्य कालावधी मानला जातो. हवामान खात्याचे अद्ययावत अपडेट पाहूनच पेरणीचे नियोजन करणे अधिक फायदेशीर ठरेल.
मे महिन्यातील पाऊस म्हणजे मान्सून नाही!
मे महिन्यात काही भागात झालेला पाऊस हा अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तो मान्सून पाऊस समजून पेरणी केली, मात्र प्रत्यक्षात अजून मान्सून महाराष्ट्रात पोहोचलेला नाही.
यंदा पावसाचं प्रमाण थोडं कमी?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.