पेरणी खर्च वाढले पण शेतमालाला बाजारात भाव नाही…

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

पेरणी खर्च वाढले पण शेतमालाला बाजारात भाव नाही…

पेरणी खर्च वाढले पण शेतमालाला बाजारात भाव नाही…

रब्बी पेरणी हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची गव्हाच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण, मागील वर्षीच्या तुलनेत खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतमालाचा भाव मिळत नाही. तर दुसरीकडे गव्हाच्या बियाण्यांचा दर १०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.

दिवाळीचा सण होताच रब्बी हंगामातील पेरणीला वेग आला आहे. परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने व दुधना नदीला दोन मोठे पूर येऊन गेल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. 

त्याशिवाय बाबूवाडी मध्यम प्रकल्पासह छोट्या मोठ्या धरणात मुबलक पाणी साठा जमा झाल्याने लाडसावंगी परिसरात रब्बीचा पेरा वाढला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गहू पेरणी सुरू झाली. पण, शेतकऱ्यांचा गहू २ हजार ते २ हजार २०० रुपये प्रति क्विंटल विकला जात आहे. तर बियाण्याचा दर १० हजार प्रति क्विंटलवर गेला आहे. खतांसह पेरणीचे दरही वाढले आहेत.

  • सध्या बाजारात शेतकऱ्यांच्या गव्हाला २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय.
  • गहू बियाणांना १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय.

एकरी लागतात १० हजार :

  • एक एकर गहू पेरणीसाठी ४० किलो बियाण्याचे चार हजार, ट्रॅक्टरने पेरणी दीड हजार, रासायनिक खते १८००, सर सरळ करणे व पाणी भरणे २००० असा सुमारे १० हजार रुपये खर्च येत आहे.
  • मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाचे बियाणे एक हजार रुपयाने वाढले आहे. पेरणी व रासायनिक खतामागे ५०० रुपये दरवाढ झाली. शिवाय रोजंदारीसह दोन दिवसांच्या पाणी भरणीला विजेच्या लपंडावामुळे तीन दिवस वेळ लागत असल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.