राज्यात वादळी वारे आणि जोरदार पावसाचा येलो अलर्ट: हवामान विभागाचा इशारा
23-09-2024
राज्यात वादळी वारे आणि जोरदार पावसाचा येलो अलर्ट: हवामान विभागाचा इशारा
राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सून परतीच्या प्रवासाला निघण्यास पोषक हवामान असतानाच राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. तसेच उन्हाचा चटका, उकाडा वाढला आहे. आज (ता. २३) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, गुना, सागर, बिलासपूर, चांदबली ते पूर्व - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पश्चिम-मध्य बंगालचा उपसागर, तसेच म्यानमारच्या दक्षिण किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आजपर्यंत (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.
राज्यात पावसाला सुरुवात झाल्याने तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या आहेत. पावसाची दडी असलेल्या भागात मात्र उन्हाचा चटका वाढला आहे. रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती, ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ३५ अंशांवर पोचले आहे. उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्याने अंगाची लाही लाही होत आहे.
आज (ता. २३) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. पावसाचा जोर पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता
नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाचा मुहूर्त लांबला आहे. मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान होत असल्याने आज (ता. २३) पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून मॉन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, जळगाव, धुळे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.