पीक विमा योजनेतुन शेतकऱ्यांना २०२ कोटींची मदत…
13-08-2024
पीक विमा योजनेतुन शेतकऱ्यांना २०२ कोटींची मदत…
राज्य शासनाने अर्थसंकल्पात पीक विमा योजनेसाठी तरतुदी करूनही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती.
याविषयी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन चंद्रपूर तसेच मुंबईमध्ये कृषीमंत्री व सचिवांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
त्यानंतर मात्र विमा कंपनी नरमली असून जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. जिल्ह्यात प्रथमच पीक विम्याची २०२ कोटी ७६ लाखांची रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत वितरित होणार आहे. नियोजन भवन येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेण्यात आला.
४६ हजार ५०० शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा:
ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीक विम्याचा क्लेम मिळाला नाही. अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होणार आहे. उर्वरित ४६ हजार ५० शेतकऱ्यांना आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच साधारण ५६ कोटी रुपये मिळणार आहेत.
जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विम्याचे ३ लक्ष ४६ हजार अर्ज
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यापूर्वी केवळ ६२ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता, मात्र गतवर्षी १ लक्ष ८४ हजार २६० शेतकऱ्यांचे ३ लक्ष ४१ हजार २३३ अर्ज आले. तर यावर्षी आतापर्यंत १ लक्ष ७९ हजार ४२२ शेतकऱ्यांचे ३ लक्ष ४६ हजार ६९२ अर्ज आले आहेत.
४ हजार ६६८ डुप्लिकेट अर्जाची पडताळणी:
जिल्ह्यातील ४ हजार ६६८ डुप्लिकेट अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये मान्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्रॉप मिसमॅचच्या १ हजार ७६२ अर्जाची कृषी विभाग आणि विमा कंपनी पुन्हा नव्याने पडताळणी करणार आहे.
नो रेनफॉलचे २० हजार ९५ अर्ज:
नो रेनफॉल या अटी अंतर्गत २० हजार ९५ असे शेतकऱ्यांचे अर्ज होते. सर्व अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने सांगितले आहे. पेरील नॉट कव्हर्ड या अंतर्गत असलेले ६ हजार ८६४ अर्ज, लेट इंटिमेशन (सूचना वेळेवर न देणे) अंतर्गतचे ७ हजार ९५९ अर्ज, क्लेम स्कुटीनी अंतर्गत ४ हजार ८११ अर्ज व इतर त्रुटी असलेले असे साधारणतः ३७ हजार व त्याहून अधिक अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने कबूल केले आहे.