आपल्या शेतात गाजरगवत कशामुळे वाढते?
22-07-2023
आपल्या शेतात गाजरगवत कशामुळे वाढते?
गाजरगवत(काँग्रेस) नियंत्रणासाठी कोणकोणत्या पद्धती वापराव्यात?
गाजर गवताची वाढ आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होत अ सल्याने, गाजर गवत निर्मूलनासाठी सामूहिकरीत्या गाव पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी दरवर्षी १६ ते २२ ऑगस्ट या काळात ‘गाजरगवत जागरूकता सप्ताह’ आयोजित केला जातो.
पांढरीफुली, चटकचांदणी तसेच काँग्रेस गवत अशा विविध नावांनी गाजरगवत ओळखले जाते. शास्त्रीय भाषेत याला ‘पार्थेनियम हिस्टेरोफोरस’ (Parthenium hysterophorus) असे म्हटले जाते. या गवताचा प्रसार अमेरिकेतील मेक्सिको येथून जगभरात झाला.
हे बारमाही तण असून अतिशय वेगाने वाढते. गाजरगवताच्या झाडाला पांढऱ्या रंगाची असंख्य फुले येऊन त्यापासून बी निर्मिती होते. या बिया रंगाला काळसर, लंब वर्तुळाकार, लहान आणि वजनाने हलक्यात असतात. बिया वजनाने हलक्या असल्याने वाऱ्यामार्फत दूरवर त्यांचा प्रसार होतो. या गवताने देशभरातील लाखो हेक्टरपेक्षा अधिक जागा व्यापली आहे. शेतातील मुख्य पिकासोबत अन्नद्रव्यांसाठी या गवताची स्पर्धा होऊन पीक उत्पादनात मोठी घट येते. आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या या गवताच्या समूळ निर्मूलनासाठी दरवर्षी १६ ते २२ ऑगस्ट या सप्ताहात ‘गाजरगवत जागरूकता सप्ताह’ आयोजित केला जातो.
आढळ ः
शेतीतील बांध, पडीक जमीन, चराऊ कुरणे, औद्योगिक वसाहती, रस्ते, रेल्वेमार्गाच्या बाजूने याशिवाय पाण्याच्या ठिकाणी या तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच तूर, कापूस, ज्वारी, भुईमूग, ऊस, भाजीपाला व फळ पिके इत्यादी सर्व पिकांमध्ये गवताचा प्रादुर्भाव आढळून येतो.
आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ः
- गाजरगवत खाण्यात आल्यामुळे मानवी आणि जनावरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम आढळून आले आहेत.
- शेतातील गाजरगवत उपटून टाकताना त्याचे परागकण श्वसनावाटे शरीरात जाऊन खोकला, शिंका, दमा आदी श्वसनविकार तसेच अंगाला खाज, त्वचा विकार इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते.
- या वनस्पतीला कडवट चव आणि विशिष्ट असा दुर्गंधीयुक्त वास येतो. त्यामुळे जनावरे हे गवत सहसा खात नाहीत. जनावरांनी खाल्यास त्यातील विषारी घटक दुधामध्ये उतरतात.
एकात्मिक नियंत्रण ः
गाजर गवत निर्मूलनासाठी सामूहिकरीत्या गाव पातळीवर सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. एकाच वेळी गावपातळीवर सामूहिकरीत्या गाजरगवत फुलावर येण्यापूर्वी नष्ट केल्यास त्याच्या वाढीस आळा बसून प्रभावी नियंत्रण मिळण्यास मदत होते.
प्रतिबंधात्मक उपाय ः
- शेतातील गाजरगवत फुलावर येण्यापूर्वी मुळासकट उपटून नष्ट करावे.
- कंपोस्ट खड्डे, ओलिताचे दांड, शेतातील बांध, शेताच्या कडेचे बांध, रेल्वेमार्ग, रस्ते, पडीक जमिनी इत्यादी ठिकाणी उगवलेले गाजरगवत मुळासकट उपटून टाकावे.
- त्यानंतर त्याचा ढीग करून वाळल्यानंतर जाळल्यास पहिल्या पावसात उगवून आलेल्या गाजर गवताचे उच्चाटन होईल.
- पावसाळा संपल्यावर वाळलेले गाजर गवत दक्षता घेऊन जाळून टाकावे.
रासायनिक नियंत्रण ः
- उभ्या पिकांतील गाजर गवत निंदणी, खुरपणी, कोळपणीद्वारे मुळासकट काढून टाकावे.
- पडीक जमिनीत म्हणजेच कोणतेही पीक, फळझाडे नसलेल्या ठिकाणी, ग्लायफोसेट (४१ टक्के एस. एल.) ८ ते १० मिलि किंवा २,४-डी (५८ टक्के) २ ते ३ मिलि प्रति लिटर यानुसार तणनाशकाची शिफारस आहे.
- तथापि २,४-डी चा वापर करताना परिसरात द्विदल पीक असलेल्या शेतात फवारणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
- उभ्या पिकात तणनाशकाचा वापर करू नये.
- उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करण्यापूर्वी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
नैसर्गिक व्यवस्थापन ः
विविध लागवडी पद्धतीप्रमाणे विविध पिकांची फेरबदल करूनही गाजरगवताची समस्या कमी करता येऊ शकते. उदा. ज्वारी, झेंडू, धैंचा, बरसीम आदींमुळे प्रसार कमी होतो तसेच वाढ खुंटते.
यांत्रिक पद्धत ः
यंत्राच्या साह्याने किंवा विळ्याने गाजरगवत मुळासकट काढून विल्हेवाट लावावी. यासाठी पावसाळा हा उत्तम काळ आहे. योग्यप्रकारे नष्ट न केल्यास ते पुन्हा उगवण्याची शक्यता असते. गाजरगवत उपटताना हातामध्ये हातमोजे घालावेत. चेहऱ्यावर रुमाल किंवा कापड बांधावे.
जैविक नियंत्रण ः
गाजरगवताचे जैविक नियंत्रणासाठी मेक्सिकन भुंग्यांचा (झायगोग्रामा बायकोलोरॅटा) यांचा वापर प्रभावी ठरतो. हे भुंगे गाजरगवत खाऊन उपजीविका करतो. ही अत्यंत कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक नियंत्रण पद्धती आहे. हे भुंगे पाऊस पडल्यानंतर प्रति हेक्टरी ५०० प्रमाणे सोडावेत.
source : agrowon