पावसामुळे कोथिंबीर भाववाढ, तरीही शेतकऱ्यांना नफा नाही...

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

पावसामुळे कोथिंबीर भाववाढ, तरीही शेतकऱ्यांना नफा नाही...

पावसामुळे कोथिंबीर भाववाढ, तरीही शेतकऱ्यांना नफा नाही...

मागील काही दिवसांपूर्वी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे भाजीपाला शेतीची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीपाठोपाठ इतर भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने भाज्यांनी भावाचा उच्चांक गाठला आहे.

नगरला कोथिंबिरीची जुडी तब्बल १२० रुपयांना विकत आहे. पावसामुळे माल खराब झाल्याने भाव वाढून सुद्धा शेतकऱ्यांचा खिसा मात्र रिकामाच आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विक्रीला आणलेल्या कोथिंबीर आणि मेथी मालाला रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर दुसरीकडे कोथिंबीर, मेथी जुडीचे भाव ऐकून सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

आवक घटली सततच्या पावसामुळे भाजीपाला खराब झाला. त्यामुळे बाजारामधील आवक घटली. त्यातच सोमवारी बैलपोळ्याचा सण व पिठोरी अमावास्या असल्याने बाजार समितीत कमी प्रमाणात शेतमाल आला, परिणामी, भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले.

बाजार समितीमध्ये कोथिंबिरीला २४ हजारांचा भाव नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीची सोमवारी ११ क्विंटल आवक झाली. त्याला ५ हजार ४०० पासून २४ हजार रुपयांचा भाव मिळाला. सरासरी भाव १४ हजार ७०० असा झाला.

भाजीपाल्याची शेती बिनभरवशाची आहे. त्यात कोथिंबिरीचे पीक नाजूक असते. यामुळे पावसाळ्यात जास्त कोणी कोथिंबिरीची लागवड करीत नाही. ज्यांनी लागवड केली होती त्यांच्या कोथिंबिरीचा पावसाने शेतात चिखल झाला. 

कोथिंबिर शेतकऱ्यांनाच खायला राहिली नाही, तर विक्रीसाठी कुठून आणायची. यामुळे भाव वाढून काही उपयोग झाला नाही.