सोयाबीन पिकावरील रोगाचे व्यवस्थापन कसे करावे?
18-07-2024
सोयाबीन पिकावरील रोगाचे व्यवस्थापन कसे करावे?
या वर्षी मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप झालेली आहे. त्याबरोबरच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य घेता न आल्यामुळे सोयाबीनची रोपे पिवळे-पांढरे पडत आहे.
लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसची लक्षणे निर्माण होतात. क्लोरासीस ही जमिनीत लोहाच्या कमतरतेमुळे होत नाही. तर काही कारणाने झाडांद्वारा लोह शोषण न केल्याने होते.
कशी ओळखावी लक्षणे :
- लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते.
- हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो व शिरा फक्त हिरव्या दिसतात.
- सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्न द्रव्य वाहू न शकणारे आहे.
- लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविले जाते. त्यामुळे, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात.
- पाने पिवळी पडल्याने हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते व वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.
काय आहेत कारणे :
- लोहाची कमतरता विशेष म्हणजे कमी प्रमाणात निचरा होणार्या चुनखडी युक्त जमिनीत होते.
- वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य-क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते.
- बहुतेक जमिनीमध्ये वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्न द्रव्य असते.
- जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो व तो पिकांना शोषून घेता येत नाही त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते.
- तसेच जमिनीत मुळांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने देखील मुळाद्वारे लोह कमी शोषला जाऊन क्लोरासीस होतो.
असे करा व्यवस्थापन :
- शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचलेले असेल ते काढण्याची सोय करावी.
- वाफसा आल्यानंतर पीक ३०-३५ दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावीच.
- ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (II) ५० ग्रॅम किंवा ५० मिली, खत १०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- आवश्यकता वाटल्यास ८-१० दिवसांनी पुन्हा एकदा फवारणी करावी.
- पाण्याचा ताण पडल्यास ठिबक च्या साह्याने संरक्षित पाणी द्यावे.
- सिंचन सुविधा उपलब्ध नसल्यास (पोटॅशियम नायट्रेट) या विद्राव्य खताच्या १०० ग्रॅम प्रति १० - लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार ८ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.