पावसात लष्करी अळीचा धोका वाढतोय! प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे ५ उपाय जाणून घ्या...
13-07-2025

पावसात लष्करी अळीचा धोका वाढतोय! प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे ५ उपाय जाणून घ्या...
सध्या राज्यात भात लागवडीला वेग आलेला असताना, वातावरणातील बदल – सततच्या ऊन-पावसाच्या लहरी – भात पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढवत आहेत. विशेषतः लष्करी अळी आणि खोडकिडा यांचे रोपवाटिकांमध्ये आणि लहान भात रोपांवर आक्रमण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
लष्करी अळीचा भात पिकावर प्रभाव – लक्षणं ओळखा:
- लष्करी अळी पावसाने निर्माण केलेल्या उघडीप आणि वाढत्या तापमानात लवकर वाढते.
- ही कीड रोपवाटिकेपासूनच भात पिकावर हल्ला करते.
- पाणी नसलेल्या भातखाचरात अळी जमिनीतील भेगांमध्ये, बांधावरील गवतामध्ये किंवा चुडांमध्ये लपते.
- रात्रीच्या वेळी ही अळी भात रोपांवर चढून लोंब्या कुरतडते.
- लोंब्या फुलण्याआधीच नष्ट झाल्यामुळे दाण्यांचा उत्पादनात मोठी घट होते.
- ही कीड एका रात्रीत संपूर्ण क्षेत्रात नुकसान करू शकते.
प्रभावी व्यवस्थापनाचे उपाय:
पाण्याचे व्यवस्थापन:
जिथे पाण्याची उपलब्धता आहे तिथे प्रादुर्भावित भातशेतीत पाणी साठवा. अळ्या जमिनीत लपण्याऐवजी रोपांवर येतील आणि पक्ष्यांचे शिकार बनतील.
पक्षी थांबे उभारणे:
शेतीत पक्ष्यांसाठी बांबू किंवा काठीचे थांबे उभे करा, जेणेकरून पक्षी नैसर्गिक कीड नियंत्रण करतील.
चर खोदून पाणी अडवा:
अळी एक शेतातून दुसऱ्या शेतात जाऊ नये म्हणून भातशेतीच्या कडेला चर (बंदी) खोदून त्यामध्ये पाणी भरून ठेवा.
सामूहिक मोहिम राबवा:
शेजारील शेतकरी एकत्र येऊन सामूहिक नियंत्रण उपाय योजना केल्यास लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी करता येईल.
शेतकऱ्यांना सूचना:
लष्करी अळीचे लक्षणं दिसताच विलंब न करता योग्य उपाययोजना राबवा. एकट्याने नाही, तर संपूर्ण गावस्तरावर एकत्र येऊन नियंत्रणासाठी पुढाकार घ्या.