महाराष्ट्र हवामान अंदाज: पुढील ५ दिवस राज्यात जोरदार वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Rain : पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज आला: राज्यात 'या' जिल्ह्यांत जोरदार वादळी पावसाचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडील राज्यात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होत आहेत.
पुढील काही दिवस कोकण, सह्याद्रीचा घाट परिसर आणि राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची स्थिती उत्तम राहील. तर विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, मराठवाड्याला अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून शेतकरीवर्गात चिंता आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील पाच दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस हवामान विभागाने पुढील ५ दिवसांसाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कुठे कधी राहणार पाऊस?
◼️ १७ जुलै नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मेघगर्जना व विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
◼️ १८ जुलै छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाच्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
◼️ १९ जुलै अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या व आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.