नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात, शेतकऱ्यांना मिळणार मोफत प्रशिक्षण व अनुदान…!
19-05-2025

नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात, शेतकऱ्यांना मिळणार मोफत प्रशिक्षण व अनुदान…!
शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कपात करून निसर्गाशी सुसंगत शेती पद्धतीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जिल्हास्तरावर सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक ग्रामपंचायतीत नैसर्गिक शेती गट स्थापन करून, शाश्वत शेतीचा प्रसार केला जाणार आहे.
शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षणाची संधी:
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांसाठी मोफत प्रशिक्षण, तसेच महिलांसाठी कृषी सखी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय, नैसर्गिक शेती मॉडेल फॉर्म उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे.
अभियानाची मुख्य उद्दिष्टे:
- जमिनीचा पोत सुधारून उत्पादनक्षमता वाढवणे
- बाह्य निविष्ठांवर अवलंबित्व कमी करून शेतातच जैविक निविष्ठांची निर्मिती
- स्थानिक पशुधनाधारित नैसर्गिक पद्धतींचा प्रचार
- उत्पादन खर्चात घट
शेतीचे प्रमाणीकरण नैसर्गिक पद्धतीने करणे
कृषी सखींची निवड व गट तयार होणार:
या योजनेमध्ये कृषी सखींची निवड करण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत गावोगाव नैसर्गिक शेतीच्या तत्त्वांची माहिती दिली जाईल व गट स्थापन करण्यात येतील.
सहभागी व्हा – ग्रामपंचायतींना आवाहन:
या अभियानात भाग घेण्यासाठी इच्छुक ग्रामपंचायतींनी आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा तालुका संनियंत्रण समिती अध्यक्षांकडे सहमती प्रस्ताव सादर करावा.
नैसर्गिक शेतीसाठी संपर्क कुठे कराल.?
ज्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची आवड आहे, त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कृषी विभाग, तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.