पाऊस कितीही पडो, ह्या पद्धतीने पिकं हमखास फुलतात..!
25-06-2025

पाऊस कितीही पडो, ह्या पद्धतीने पिकं हमखास फुलतात..!
सध्या हवामानातील सतत बदल, अनियमित पावसाळा, वाढती तापमानं आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता यांचा थेट परिणाम शेतीवर होतो आहे. अशा स्थितीत पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहणं फारसे फायदेशीर ठरत नाही. आधुनिक काळात शेतकऱ्याला यशस्वी शेतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनासोबत तांत्रिक प्रगतीची जोड आवश्यक आहे.
अशा तंत्रांपैकीच एक प्रगत, फायदेशीर आणि टिकाऊ शेतीपद्धत म्हणजे BBF म्हणजेच Broad Bed and Furrow, मराठीत रुंद वरंबा आणि सरी पद्धत.
BBF पद्धतीचे फायदे - पारंपरिक शेतीपेक्षा कितीतरी पटीने पुढे:
BBF पद्धतीमध्ये ४५ ते ६० से.मी. अंतरावर वरंबे तयार केले जातात आणि त्यामध्ये सऱ्या सोडल्या जातात. ही विशेष रचना अनेक प्रकारे उपयुक्त ठरते. बीबीएफ यंत्राद्वारे एका फेरितच बियाणे पेरणी, खताची टाकणी आणि आंतर मशागत एकत्र केली जाऊ शकते, ज्यामुळे वेळ, श्रम आणि खर्च यांची मोठी बचत होते.
पावसाचे पाणी आणि बियाण्यांची सुरक्षा:
या तंत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पावसाचे पाणी सऱ्यांमधून सहज निचरा होते, वरंब्यावर साचत नाही. यामुळे बियाण्यांची कुज होण्याचा धोका टळतो. मुळे आरोग्यदायी राहतात कारण त्यांना आवश्यक ती हवा आणि ओलावा योग्य प्रमाणात मिळतो. परिणामी, पिकांची वाढ अधिक चांगली होते आणि उत्पादनात २० ते २५% पर्यंत वाढ दिसते.
रोग, कीड आणि तण नियंत्रण अधिक परिणामकारक:
BBF पद्धतीमुळे हवेशीर वातावरण निर्माण होते, ओलसरपणा टळतो आणि त्यामुळे बुरशीजन्य व इतर रोगांचा प्रसार कमी होतो. तण नियंत्रणही अधिक सोपे आणि प्रभावी होते. विविध प्रक्रिया — फवारणी, खत टाकणी, मशागत — या सगळ्या BBF यंत्राद्वारे अचूकपणे आणि वेगाने केल्या जाऊ शकतात.
खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ:
बीबीएफ तंत्रामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांचा वापर कमी, मजुरीचा खर्च घटतो आणि सिंचनाचा वापर अधिक कार्यक्षम होतो. विशेषतः कोरडवाहू भागात BBF हे तंत्रज्ञान वरदान ठरते. कारण या पद्धतीत जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकतो, जे दुष्काळी परिस्थितीत फार उपयुक्त ठरते.
निष्कर्ष – BBF शेती ही काळाची गरज:
BBF म्हणजे फक्त एक नवे तंत्र नव्हे, तर शाश्वत शेतीसाठीचा मार्ग आहे. आधुनिक शेतकऱ्यांनी ही पद्धत स्वीकारल्यास बदलत्या हवामानाचा प्रभाव कमी करत मोठ्या उत्पादनासोबत अधिक नफा मिळवणे शक्य होईल.