हवामान अंदाज: १ ते १२ जुलै दरम्यान गोदावरी नदीला महापुराचा इशारा; मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी!

हवामान अंदाज: १ ते १२ जुलै दरम्यान गोदावरी नदीला महापुराचा इशारा; मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी!
"शेतकरी बांधवांनो, विशेषतः ऊस उत्पादकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातून उगम पावणाऱ्या गोदावरी नदीला १ जुलै ते १२ जुलै २०२६ दरम्यान मोठा पूर म्हणजेच महापूर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि कॅचमेंट एरियामधील शेतकऱ्यांनी आपल्या मोटारी आणि पाईपलाईनची तातडीने काळजी घ्यावी. आज १ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर प्रचंड वाढत असून पुढील ८ जुलैपर्यंत सर्वत्र धुमाकूळ पाऊस बरसणार आहे," असा कडक इशारा हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे.
प्रमुख धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक; पाझर तलाव भरणार!
उत्तर महाराष्ट्रात १ ते ८ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील निळवंडे, भंडारदरा आणि गंगापूर धरणांमध्ये पाण्याचा प्रचंड विसर्ग आणि आवक सुरू होईल. तसेच ग्रामीण भागातील १ ते २ टीएमसी क्षमतेचे छोटे-छोटे पाझर तलाव आणि बंधारे या पहिल्याच मोठ्या पावसात पूर्णपणे भरून जातील.
प्रादेशिक व जिल्हावार हवामान अंदाज (१ ते ८ जुलै):
उत्तर महाराष्ट्र व खानदेश: नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत जरी पाऊस काहीसा उशिरा (लेट) आला असला, तरी या आठवड्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जमिनीची पाण्याची पातळी (वॉटर टेबल) मोठ्या प्रमाणात वाढेल. अहिल्यानगर, संगमनेर आणि अकोले पट्ट्यातही मुसळधार पाऊस होईल.
मराठवाडा: परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे. यामुळे पावसाअभावी राहिलेल्या उर्वरित सर्व भागांतील शेकऱ्यांच्या पेरण्या १० ते १५ जुलै दरम्यान पूर्ण होतील.
पश्चिम महाराष्ट्र: सोलापूर, धाराशिव, लातूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा या परिसरात १, २ आणि ३ जुलै दरम्यान अनेक ठिकाणी मान्सूनच्या पावसाला जोमाने सुरुवात होत आहे.
विदर्भ: विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असून ओढे-नाल्यांना पाणी येईल.
मुंबई, पुणे व कोकण: मुंबई, ठाणे, पुणे, कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर १ ते ८ जुलै दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.