हवामान अंदाज: १ ते ८ जुलै दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पाऊस; मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्राला अतिवृष्टीचा कडक इशारा!

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

हवामान अंदाज: १ ते ८ जुलै दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पाऊस; मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्राला अतिवृष्टीचा कडक इशारा!

हवामान अंदाज: १ ते ८ जुलै दरम्यान राज्यात धो-धो पाऊस; मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा कडक इशारा!

 

 "शेतकरी बांधवांनो, २५ जूनपर्यंत राज्यातील मराठवाडा आणि विदर्भासह अनेक भागांत दमदार पाऊस झाला आहे. परंतु, सोलापूर, सांगली, लातूर आणि धाराशिवच्या काही भागांत अद्याप म्हणावा तसा पाऊस न झाल्याने चिंता वाढली होती. आता घाबरू नका, आज २७ जूनपासून या प्रलंबित पट्ट्यांमध्ये पाऊस सुरू होत असून १ ते ८ जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात मुसळधार पाऊस पडेल आणि सर्वांच्या पेरण्या पूर्ण होतील. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तर राज्यात ठीकठिकाणी भयंकर अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे," असा महत्त्वपूर्ण संदेश हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी थेट आपल्या शेतातून दिला आहे.

 

मराठवाडा आणि विदर्भात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस!

 

  • मराठवाडा: परभणी, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात २७ जूनच्या रात्रीपासून पाऊस सुरू होऊन तो थेट ८ जुलैपर्यंत सक्रिय राहील. हा पाऊस दररोज भाग बदलत वेगवेगळ्या तालुक्यांत आणि गावांत हजेरी लावेल.

  • विदर्भ: विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये २७ जून ते ८ जुलै दरम्यान दररोज जोरदार पाऊस पडेल. पावसाअभावी वंचित राहिलेल्या भागातही या १० दिवसांत चांगला पाऊस होऊन पेरण्या पूर्ण होतील.

  •  

🚨 १ ते ८ जुलै: मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा

जुलै महिन्याचा पहिला आठवडा राज्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

 

  • मुसळधार आणि अतिवृष्टी: मुंबई, पुणे, संगमनेर, अकोला, ओझर आणि विघ्नहर कारखाना परिसरात ढगफुटीसदृश अतिमुसळधार पाऊस कोसळेल.

  • उत्तर महाराष्ट्र आणि धरण क्षेत्र: नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत सुरुवातीला पाऊस काहीसा लेट असला, तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यात तिथे इतका प्रचंड पाऊस पडेल की जमिनीची पाण्याची पातळी (वॉटर टेबल) लक्षणीयरीत्या वाढेल. या पावसामुळे निळवंडे आणि गंगापूर धरणासह प्रमुख धरणांच्या कॅचमेंट एरियामध्ये पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू होऊन नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे.

  •  

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सूचना

सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, धाराशिव आणि बारामती पट्ट्यात पाऊस पडणार असला, तरी या भागात राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत पावसाचे झुकते माप थोडे कमी राहू शकते. २७ ते ३० जून दरम्यान येथे पाऊस सुरू होईल आणि १ जुलै नंतर सरीवर सरी येत राहतील. शेतकऱ्यांनी घाई न करता जमिनीत ईतभर (पुरेशी) ओल तपासूनच पेरणीचा योग्य निर्णय घ्यावा.

 

यंदा जूनमध्ये पाऊस जेमतेम राहिला असला, तरी जुलैमध्ये तो जोरदार असेल, ऑगस्टमध्ये दोन मोठे पाऊस होतील आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस धुmaकूळ घालेल; त्यामुळे पिके जोमदार येतील आणि दुष्काळाचे संकट पूर्णपणे टळेल.